घुग्घूस : १२ दिवसांच्या आमरण उपोषणाची अखेर सांगता!
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मध्यस्थीनंतर भदंत रत्नमणी थेरो यांनी सोडले उपोषण.

घुग्घूस | शांतीनगर
शांतीनगर येथील बोधिसत्व बुद्ध विहार, बोधीवृक्ष आणि धम्मध्वजाच्या संरक्षणासाठी ७ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर १८ सप्टेंबर रोजी सांगता झाली.
बौद्ध विहाराच्या प्रश्नासाठी आमरण उपोषण करणारे भदंत रत्नमणी थेरो यांची खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपोषणस्थळी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बौद्ध विहारासाठी कंपनीकडून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासह त्या ठिकाणी विहाराचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

खासदारांच्या आश्वासनानंतर त्यांनी भदंत रत्नमणी थेरो यांना नारळपाणी देऊन उपोषण सोडविले. त्यामुळे गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला तूर्तास विराम मिळाला आहे.
🔴 आंदोलनाला बौद्ध समाजाचा पाठिंबा
शांतीनगर येथील बौद्ध विहाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भदंत रत्नमणी थेरो यांनी आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. उपोषणादरम्यान परिसरातील बौद्ध समाज तसेच नागरिकांकडून आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत होता.

अखेर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपोषणस्थळी भेट देत मध्यस्थी केली. पर्यायी जागा आणि नवीन विहाराच्या बांधकामाबाबत दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
⚠️ आता आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष कृतीची गरज!
उपोषणाची सांगता झाली असली तरी दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरणार आहे.
कंपनीकडून पर्यायी जागा नेमकी कुठे आणि किती उपलब्ध करून दिली जाणार? विहाराच्या बांधकामाला कधी सुरुवात होणार? तसेच संपूर्ण प्रक्रिया कोणत्या कालमर्यादेत पूर्ण होणार? याकडे शांतीनगरवासीयांचे लक्ष लागले आहे.

आश्वासनामुळे उपोषणाला विराम मिळाला असला तरी बौद्ध विहाराच्या प्रश्नाचा अंतिम निकाल प्रत्यक्ष जागा उपलब्ध होऊन बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच लागणार आहे. त्यामुळे दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
🟥 AMC24 NEWS
मुख्य संपादक : अरविंद चाहादे, घुग्घूस
📞 9405714165



