प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात प्रहारचा एल्गार; पाणी टाकीवर चढून अमोल मांढरे यांचे विरूगिरी आंदोलन

घुग्घुस, दि. ३० जून : मागील अनेक वर्षांपासून जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाने सातत्याने केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल नथ्थुजी मांढरे यांनी मंगळवारी पहाटे ५ वाजल्यापासून घुग्घुस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाणी टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाची धावपळ सुरू झाली.

आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांचे प्रलंबित प्रश्न, गावातील मध्यवर्ती तलावाची तातडीने स्वच्छता, मोठ्या कंपन्यांच्या शिक्षणसंस्थांमध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना फी माफी, गावातून होणारी जीवघेणी जड वाहतूक गावाबाहेरून वळविणे तसेच अनेक वर्षांपासून रखडलेल्या जनहिताच्या विविध मागण्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.

सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने प्रशासनाला अखेर हस्तक्षेप करावा लागला. घुग्घुस नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या दालनात लवकरच संयुक्त बैठक घेऊन सर्व मागण्यांवर निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर अमोल मांढरे यांनी जनहिताचा विचार करून विरूगिरी आंदोलन तात्पुरते स्थगित केले

यावेळी अमोल मांढरे यांनी स्पष्ट इशारा दिला की, लेखी आश्वासनाची पूर्तता झाली नाही, तर यापुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे असेल आणि त्यास उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील.
AMC 24 News 📰 🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घुस 9405714165



